मला नेहमी प्रश्न पडतो, मी नक्की कोणत्या काळात जगतोय?
म्हणजे शरीर इथे आजच्या दिवसात.
पण मन...?
ते अजूनही गावातच फिरतय. शाळेजवळ, दगडी मंदिराजवळ, तलावाच्या पायऱ्यांवर, लिंबाच्या सावलीत, कधी दमदम्यावर मित्रांसोबत, कधी शाळेत, वर्गाच्या खिडकीतून बाहेर बघत.
कधी कधी वाटतं आपण मोठे झालोय ही गोष्ट सगळ्यांनी मान्य केलीय, पण आपल्या मनाने अजून मान्य केलेली नाही.
लोक म्हणतात आठवणींत जगू नये.
पण आठवणींत जगतो कोण?
आठवणीच आपल्यात जगत असतात.
जुन्या वहीचा वास आला की अचानक शाळा समोर उभी राहते.
जुनं गाणं ऐकलं, की कुणाचा तरी चेहरा आठवतो.
हिवाळ्यात शेकोटीच्या गप्पा.
पावसाळ्यात चिखलाच्या पायवाटा.
माणूस इतक्या छोट्या छोट्या गोष्टी का जपून ठेवतो?
त्याला माणसं जपता येत नाहीत म्हणून.
काही लोक निघून जातात, काही भेटणं बंद करतात, काही कायमचे हरवतात.
पण त्यांच्याशी जोडलेले क्षण थोडीच हरवतात.
ते तर आपल्याच आत राहतात.
मला अजूनही काही माणसं वर्तमानकाळात आठवत नाहीत, ती नेहमी भूतकाळातच भेटतात, तेव्हा जशी होती तशीच. त्यांच तेच हसणं, तेच बोलणं, त्याच वयातलं.
बहुतेक म्हणूनच मी जुन्या गोष्टी इतक्या लिहितो.
तुम्हाला काय वाटतं मी कथा लिहितो?
खरं तर मी हे जपतो.
माणसं,शाळा, मित्र मैत्रीण, झाडं, मंदिर, तलाव, दगडी पायरी,शेत शिवार,नदी,नाला, सण उत्सव, सर्व सर्व आठवतं.
बाकी आयुष्यात मिळवलं काय, गमावलं काय, हा हिशोब मला कधी जमला नाही.
पण एवढं मात्र खरं...
जग पुढे निघून गेलं असलं, तरी माझ्या मनात अजून तेच गाव आहे.
तिथं अजूनही शाळा भरते....
तलावात अजूनही गरम पाणीय....
तिथली माणसं...
हे सर्व अजूनही तिथंच आहेत.
माझी वाट बघत.
कदाचित मी त्यांची.
@जयंत
खूप सुंदर
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏🏻👍🏻
हटवा