शाळा शिकत असताना, इमारत, वर्गखोल्या, फळ्यावरील सुविचार, बाक, त्यावर कोरलेली नावं, दप्तरं, पुस्तकं, वह्या, धडे कविता, वर्गात घडलेले क्षण, पटांगण, झाडं, शाळेचा भवताल... हे सारं त्यावेळेस नेणीवेत जसं साठवून ठेवलं गेलं, तसंच ते शाळा सुटल्यावरही आठवणींच्या धूसर पण जिवंत चित्रफितीसारखं डोळ्यासमोर उभं राहतं.
दोन मजली इमारत, मध्यभागी रंगमंच, कार्यालय, वर्ग, वरांडा, चौकोनी वर्गखोल्या, खालून पुसट होत गेलेला पांढरट रंगाच्या भिंती, कोळीच्या जाळ्यांचे कोपरे, आणि समोरच्या भिंतीला मधोमध असलेला काळा रंगाचा फळा. फळ्याच्या वरती दररोज नवीन सुविचार.
फळ्यासमोर तोंड करून लाकडी बाकांच्या चार ओळी.
डावी कडच्या दोन ओळींवर मुलं, उजवीकडच्या दोन ओळींवर मुली, अशी बैठक व्यवस्था.
अनेक हातांनी खरडलेले. पेन, पेन्सिल, कर्कटक ने कोरलेली नावानी नक्षीकाम असलेले बाक,
बाकाच्या खाली दप्तर ठेवायला असलेली पाटी लावलेला कप्पा. दप्तरं जड वाटायची, पण त्यात काय असायचं? पुस्तकं, वह्या,एक-दोन पेन, पेन्सिली, रबर, शार्पनर, पट्टी आणि एका कप्प्यात ठेवलेला जेवणाचा डब्बा.
आणि शाळेचं पटांगण... तिथे तर सारे ऋतू उतरायचे. उन्हाळ्यात धुळीचे लोट उडायचे, पावसात मातीचा सुगंध दरवळायचा, हिवाळ्यात सकाळी त्या मैदानात थंडीने दात कुडकुडायचे. त्या पटांगणात लिंबाचे, निलगिरीचे, अशोकाचे दाट झाडं होते. त्या झाडांच्या सावलीत डब्बे खायचो, खेळ खेळायचो.
शाळा म्हणजे एक जिवंत वास्तू होती जिथे आपण मोठे होत गेलो, जिथे नकळत आपल्या आतलं लहान मूल जपलं गेलं. आणि आज, वर्षानुवर्षांनीही, त्या वर्गखोल्यांची भिंत,फळा ,बाक, पटांगण, झाडं अन तिथला सारा भवताल अजूनही मनात खोल आपली ओळख घेऊन टपून बसलाय.








